शिर्डी साईभक्तांसाठी नवी रेल्वे; पुणे-शिर्डी एक्सप्रेस सुरू, दौंड, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी, बेलापूरला थांबे

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ

पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून झेंडा दाखवून शुभारंभ केला.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे उपस्थित होते.पुणे रेल्वे स्थानक येथे केंद्रीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार विवेक कोल्हे आदी उपस्थित होते.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पुणे रेल्वे परिसराची क्षमता वाढविण्यासाठी हडपसर, शिवाजीनगर, खडकी, उरुळी आणि आळंदी परिसरातील विविध रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पुणे जंक्शनचे आधुनिकीकरण, अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारणी, आकुर्डी येथे मेगा कोचिंग टर्मिनल; तसेच अत्याधुनिक डिजिटल सिग्नलिंग व्यवस्था यामुळे पुढील तीन ते साडेतीन वर्षांत पुणे रेल्वेची क्षमता दुप्पट होईल आणि सुमारे 20 अतिरिक्त गाड्या चालविणे शक्य होणार आहे.

मुंबई–पुणे मार्गावरील तिसरी व चौथी रेल्वे लाईन; तसेच भविष्यातील मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद बुलेट ट्रेन हे प्रकल्प महाराष्ट्रासाठी मोठी आर्थिक ताकद निर्माण करतील. महाराष्ट्रासाठी रेल्वे अर्थसंकल्पात सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील 129 स्थानकांचे पुनर्विकास काम सुरू असून त्यापैकी 93 स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात सध्या 24 वंदे भारत सेवा सुरू असून भविष्यात वंदे भारत स्लीपर गाड्यांसह आणखी अनेक आधुनिक रेल्वे सेवा उपलब्ध होणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

पुणे हे राज्यातील प्रमुख शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक केंद्र असून देशभरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजकांचे आकर्षण केंद्र आहे. दुसरीकडे, श्री साईबाबांचे पवित्र स्थान म्हणून ओळखले जाणारे शिर्डी हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दररोज लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. नव्या रेल्वेसेवेमुळे पुणे आणि परिसरातील भाविकांना अधिक सुरक्षित, परवडणारा आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.विशेषतः ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि समूहाने प्रवास करणाऱ्या भक्तांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील नागरिकांना पुण्यातील उच्च शिक्षण आणि वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. याशिवाय शिर्डीतील हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा आणि स्थानिक विक्रेत्यांनाही या रेल्वेसेवेचा लाभ मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसला दौंड कॉर्ड केबिन, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी आणि बेलापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार वर्ग आणि संशोधकांच्या प्रवासाची सुविधा वाढणार आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थी व संशोधकांना तर या सेवेचा विशेष लाभ होणार आहे. बेलापूर स्थानकामुळेशनि शिंगणापूर परिसरातील धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles