राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने राज्यातील विविध बँकांकडून शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलित केली आहे. विशेष म्हणजे, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या कर्जदारांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता असून, अंदाजे ३४ ते ३५ लाख शेतकरी या निर्णयामुळे लाभार्थी ठरणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने बँकांकडून माहिती मागवली होती. यामध्ये बँकेच्या शाखेपासून आयएफएससी कोड, संस्था आयडी, सभासद क्रमांक, आधार क्रमांक, शेतकऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, जिल्हा, तालुका, गाव, जमीन रेकॉर्ड, ग्राहक आयडी, खाते क्रमांक, मंजूर कर्ज रक्कम, कर्ज वितरणाची तारीख, परतफेडीची माहिती, मुद्दल व व्याजाची रक्कम, पीककर्जाची माहिती आदींचा समावेश आहे.
ही माहिती २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांतील नियमित तसेच थकबाकीदार कर्जदारांची घेण्यात आली आहे. बँकांनी संबंधित माहिती भरून ती सहकार विभागाकडे सादर केली असून, विभागाने पात्र लाभार्थ्यांची माहिती राज्य सरकारकडे सुपूर्द केली आहे.
दरम्यान, सरकारकडून कर्जमाफीसाठीचे अंतिम निकष निश्चित करण्याचे काम सुरू आहे. मे अखेर होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ दिला जाईल, अशी माहिती आहे. यासोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे नियमित कर्जदारांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.


