गेल्या चार दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली. शहरासह उपनगरांतील अनेक भागांत जोरदार सरी कोसळल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यरात्रीपासून अंधेरी, साकीनाका, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), मुलुंड, बोरिवली, कांदिवली आणि इतर उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. आज सकाळीही आकाश ढगाळ असून अनेक भागांत हलक्या सरी सुरू आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबईसह कोकण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यभर समाधानकारक पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. भारतीय हवामान विभागाने विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईसह कोकण पट्ट्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील इतर भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील लोणावळा येथे गेल्या २४ तासांत राज्यातील सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


