मराठा समाजासाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला आता सवलती मिळणार आहेत. मराठा समाजाच्या मुलांसाठी शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ओबीसी समाजाप्रमाणे तब्बल ८ योजना मराठा समाजासाठी सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय आज घेण्यात आला आहे.
– शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना
– मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना
– माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना
– विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर १६ बाबींबाबतची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना
– महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी लागू असलेली योजना
– ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी ही पात्र असणार आहेत.
– ओबीसी विद्यार्थ्यांनी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करण्यात येणार आहेत.
– ज्या शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा इतर मागास प्रवर्गास लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील, त्या सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होतील.
सरकारच्या निर्णयानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नाराजी व्यक्त केली. मराठा समाजाबाबत सरकार तातडीने निर्णय घेतं पण ओबीसी महामंडळाला १ रुपयाचा निधी देत नसल्याची तक्रार लक्ष्मण हाके यांनी केली आहे. ओबीसींना सरकार काहीच देत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी सांगितले की, वसंतराव नाईक मंडळ, महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ आणि पुण्याश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी महामंडळ असो यांना काहीच दिले जात नाही. फक्त मराठा समाजालाच सरकार सर्वकाही देते, असे मत त्यांनी मांडले आहे.


