महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून सध्याची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे निष्ठावंत आणि धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर हे मध्यरात्री अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. ओमराजे निंबाळकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड सस्पेन्स निर्माण झाला आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर हे रात्री पुण्यातून विमानाने दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.ओमराजे निंबाळकर यांच्या या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्यामुळे धाराशिवसह संपूर्ण मराठवाड्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात कमालीचे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव शहराध्यक्ष सोमनाथ गुरव यांनी तातडीने समोर येत या सर्व चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
शहराध्यक्ष सोमनाथ गुरव यांनी स्पष्ट केले की, “खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शिवसेना (शंदे गट) प्रवेशाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मीडियामध्ये जी ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू आहे, ती केवळ माध्यमातूनच आमच्यापर्यंत पोहोचत आहे. ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पक्षप्रवेशाबाबत कोणतेही संकेत किंवा निर्देश कार्यकर्त्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.”
ओमराजे निंबाळकर हे केवळ धाराशिव पुरते मर्यादित नसून मराठवाड्यातील लातूर, बीड आणि धाराशिव परिसरात त्यांचा मोठा राजकीय प्रभाव आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत आणि थेट जनतेच्या संपर्कात राहणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. वडील पवनराजे निंबाळकर यांच्या दुर्दैवी हत्येनंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. २००९ मध्ये ते उस्मानाबाद मतदारसंघातून पहिल्यांदा शिवसेनेचे आमदार झाले.


