गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या नगर पंचायत आणि नगर पालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकांचा निकाल उद्या (३ डिसेंबर) रोजी जाहीर होणार होता. परंतु ओबीसी आरक्षणाच्या खटल्यामुळे राज्यातील २४ नगरपरिषदांच्या आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी मंगळवारी (२ डिसेंबर) होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे. लांबवणीवर पडलेल्या नगरपरिषदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आज (२ डिसेंबर) आणि २० डिसेंबर रोजी मिळून दोन्ही टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिल्यानंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीका केली आहे. राज्यातील निवडणुकांमध्ये निर्माण झालेल्या या गोंधळासाठी त्यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगाला जबाबदार धरले आहे.
नागपूर खंडपीठाच्या या निर्णयानंतर आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, “आज उच्च न्यायालयाने निवडणुकांचा निकाल पुढे ढकलण्यासंदर्भात घेतलेला निर्णय म्हणजे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर केलेले शिक्कामोर्तबच आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली असली तरी निवडणूक आयोग पक्षाच्या दावणीला बांधला तर हेच होणार, हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. राज्यात आज जो काही गोंधळ निर्माण झाला आहे त्यासाठी निवडणूक आयोगासह भाजपादेखील तेवढीच जबाबदार आहे.”


