विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरले आहेत. मंगळवारी (2 जून) पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत सर्व उमेदवारांनी आवश्यक निकष पूर्ण केल्याचे स्पष्ट झाल्याने निवडणुकीच्या रिंगणातील पाचही दावेदार कायम आहेत. आता येत्या गुरूवारी (4 जून) उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष त्या दिवसाकडे लागले आहे.
या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे उमेदवार तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे करण ससाणे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारीऐवजी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने निवडणुकीत वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. याशिवाय श्रीगोंद्याचे दत्तात्रय पानसरे, शेवगावचे कमलेश गांधी आणि राहुरीचे मच्छिंद्र धुमाळ यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत. छाननी प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या मैदानात सध्या पाच उमेदवार कायम असले तरी प्रत्यक्ष राजकीय समीकरणे माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच स्पष्ट होणार आहेत. विविध पातळीवर सुरू असलेल्या चर्चांमुळे काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अंतिम रिंगणात किती उमेदवार राहतील, निवडणूक रंगतदार होईल की बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होईल, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदानाची पध्दत लागू असते. त्यामुळे मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पक्षचिन्ह नसते. उमेदवारांची नावे राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्ष आणि स्थानिक पक्ष अशा श्रेणीनुसार छापली जातात. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीच्या अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून, पुढील दोन दिवसांत राजकीस हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 4 जून हा दिवस या निवडणुकीसाठी निर्णायक ठरणार आहे.


