राज्यातील बळीराजासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून एक ऐतिहासिक आणि अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कर्जमाफीची घोषणेच्या आश्वासनाची पूर्तता केली. आजच्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली आहे. मात्र, कॅबिनेट बैठकीत या मेगा कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झाले असले, तरी निवडणुकीच्या तांत्रिक कारणामुळे सरकारला याची अधिकृत घोषणा करता आलेली नाही.समोर आलेल्या माहितीनुसार शेतकरी कर्जमाफी योजनेला आज मान्यता मिळाली आहे. मात्र विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे या कर्जमाफीची घोषणा आत्ताच केली जाणार नाही. विधानपरिषद निवडणूक संपल्यानंतर ही घोषणा होणार आहे.आगामी काळात अटी आणि शर्थींबाबत सरकारकडून माहिती देण्यात येणार आहे. या कर्जमाफी निर्णयाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. राज्यातील एकूण 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. तसेच जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात, त्यांना प्रोत्साहनपर रक्कमही दिली जाणार आहे. ऐन मान्सूनच्या तोंडावर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे निकष काय?
योजनेची पात्रता: 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत थकीत पीक कर्ज माफी
कर्जमाफीचा किती फायदा: या योजनेत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे.
नियमित कर्ज फेड करणाऱ्या उमेदवारांना प्रोत्साहन: नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50,000 रूपयांपर्तंचे अनुदान देणार आहे. त्यांचे अतिरिक्त 50 हजार कर्ज माफ होईल.
सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार: या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे 25 हजार कोटींचा भार पडण्याची शक्यता आहे.


