मुंबई-महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये चुका झाल्याचा आणि याद्या चलाखीने विभागल्या गेल्याचा आरोप होत असताना राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील चुकांबद्दल संबंधित महापालिकांना जबाबदार धरले आहे.महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका आयुक्तांच्या स्तरावर करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत हरकती आणि सूचना किंवा काही तक्रारी असल्यास त्या २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत संबंधित महानगरपालिकेत दाखल कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांकरिता १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. या मूळ मतदार याद्या भारत निवडणूक आयोगाने तयार केल्या आहेत. त्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. त्यानुसार २० नोव्हेंबर २०२५ रोजी संबंधित महानगरपालिकेच्या ठिकाणी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
मतदार यादीतील आपले नाव https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName या संकेतस्थळावर शोधता येईल. त्यावर २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात. प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे आदी स्वरूपाची कार्यवाही केली जात नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकांसंदर्भात तसेच मतदाराचा (Voter) चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील हरकती आणि सूचना महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.


