अहिल्यानगर – जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विवाह सोहळ्यात केवळ माईकवर नाव पुकारले नाही, या शुल्लक कारणावरून एका तलाठ्याने सूत्रसंचालन करणाऱ्या तरुणाला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत सूत्रसंचालक गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील ‘मातोश्री मंगल कार्यालयात’ एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नकार्यात अशोक रामचंद्र पठाडे हे सूत्रसंचालक म्हणून आलेल्या पाहुण्यांचे माईकवरून नाव पुकारून स्वागत करत होते.लग्न सोहळा सुरू असतानाच तिथे उपस्थित असलेले तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांनी अचानक व्यासपीठाजवळ येत वाद घालण्यास सुरुवात केली. “तू माईकवर माझे नाव का घेतले नाही?” असा जाब विचारत तलाठ्याने अशोक पठाडे यांना भर मंडपात सर्वांसमोर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद एवढा वाढला की, मग्रूर तलाठी हजारे यांनी नियंत्रण गमावले आणि पठाडे यांना जोराची चापट मारली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी पठाडे यांच्या हातातील लोखंडी माईक हिसकावून थेट त्यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात लोखंडी माईक डोक्यात लागल्यामुळे पठाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.हा धक्कादायक प्रकार घडताच लग्नकार्यात एकच खळबळ उडाली. उपस्थित पाहुण्यांनी आणि नातेवाईकांनी तात्काळ मध्यस्थी करत वाद सोडवला आणि जखमी अशोक पठाडे यांना उपचारासाठी तात्काळ जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी जामखेड पोलिसांनी आरोपी तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एका जबाबदार सरकारी पदावर असलेल्या व्यक्तीने केवळ वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी आणि नाव पुकारले नाही म्हणून केलेल्या या गुंडगिरीमुळे संपूर्ण तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जामखेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


