अहिल्यानगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत व पर्यावरण संरक्षणाच्या आवाहनाला तसेच राज्य शासनाच्या हरित उपक्रमांना प्रतिसाद देत अहिल्यानगर जिल्ह्यात आज, शुक्रवारी सरकारी कार्यालयांतून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालयांच्या आवारातून वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी आढळली.
अनेक अधिकारी व कर्मचारी सायकल, वीजेवरील वाहन, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत तसेच पायी चालत कार्यालयात पोहोचले. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हाधिकाऱ्यांचे यांचे स्वीय सहायक सुरेश आघाव सायकलवरून कार्यालयात पोहोचले. उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, गौरी सावंत, तहसीलदार शोभा पुजारी, तहसीलदार संचेती यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून नंतर कार्यालयात पायी चालत येत उपक्रमात सहभाग नोंदविला. मात्र कामानिमित्त सरकारी कार्यालयातून येणारे नागरिक बहुसंख्यपणे वैयक्तिक वाहनांचा वापर करूनच आलेले होते.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महसूल संघटनेच्या पुढाकारातून नो व्हेईकल डे उपक्रम राबविण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पायी चालत येणाऱ्या सायकलचा व विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करून कार्यालयात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ‘एक कर्मचारी – एक वृक्ष दत्तक’ ही संकल्पनाही संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. आगामी पावसाळ्यात केवळ वृक्षारोपण न करता प्रत्येक कर्मचाऱ्याने लावलेले झाड जगविण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच शासकीय कार्यालय परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी दर महिन्याला सायकल रॅली, ट्रेकिंग, योग, ध्यानधारणा व सुदर्शन क्रिया सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, उपाध्यक्ष अशोक अलका मासाळ, महिला जिल्हाध्यक्षा वंदना नेटके आदींनी दिली.पडी पिशव्यांचे वाटप करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.


