लाडकी बहीण योजनेत ८१ लाख महिला अपात्र ठरल्याने आता त्यांना देण्यात आलेले हजारो कोटी रुपये परत घेतले जाणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली असून या अपात्र ठरलेल्या ८१ लाख महिलांकडून पैसे वसूल केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र ज्या १४ हजार पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला होता त्यांच्याकडून मात्र सर्व रक्कम वसूल केली जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेत ८१ लाख महिला अपात्र ठरल्याने विरोधकांकडून महायुती सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी झाली याची माहिती दिली. डेटाबेसद्वारे लाभार्थ्यांची पडताळणी केल्यानंतर योजनेचा महिलांच्या नावे अर्ज करून लाभ घेणारे १४ हजार पुरुष निघाले, ५ लाख सरकारी, १० लाख प्राप्तीकर भरणाऱ्या महिला, घरी चारचाकी असणाऱ्या पाच लाख महिला असल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे ईकेवायसी सक्ती केल्यानंतरही अनेक महिलांनी ईकेवायसीच केली नाही. त्यामुळे अशा प्रकारे योजनेसाठी अपात्र ठरणाऱ्यांचे मानधन थांबविण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या २५ लाख महिलांची केवायसी भरताना चूक झाली होती त्यांनाही सुधारणा करण्याची संधी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.या योजनेसाठी भारताचे नियंत्रक आणि लेखा परीक्षकांकडून (कॅग) लेखापरीक्षण केले जाईल तेव्हा अपात्र महिलांना मानधन दिल्याबद्दल विचारणा होईल. मात्र तरीही पुरुष सोडून ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना एकवेळची माफी म्हणून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत. पण १४ हजार पुरुषांकडून मात्र पैसे वसूल केले जातील. हा पैसा जनतेचा आहे त्यामुळे तो नियमानेच खर्च करावा लागतो असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असेल तर पुन्हा केवायसी विंडो सुरु करण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी दाखवली.


