उन्हाचा तडाखा वाढत असताना सर्वच नागरिकांना हा दाह सोसवेना झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सकाळ उजडल्यानंतर अवघ्या काही वेळातच घराबाहेर पाय ठेवणे कठीण होत आहे. या उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना शाळा, नोकरी आणि कामानिमित्त घराबाहेर पडणे हे आता आव्हान बनत चालले आहे. यातच आता हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे अत्यावश्यक असलेली कामे करायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.१४ आणि १५ एप्रिलला आठ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. १५ एप्रिलला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर आ7 सांगली या जिल्ह्यात तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १६ एप्रिलला अकोला, अमरावतीसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.१७ एप्रिलला अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. १८ एप्रिलला बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच लातूर, धाराशिव, सांगली या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याने नागरिकांना दुपारी १२ ते ४ बाहेर पडणे टाळले पाहिजे असे आवाहन केले आहे. तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाचे काम टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उन्हात शक्यतो वाहने चालवू नये. ज्वलनशील वस्तूंपासून लांब राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच भरपूर पाणी पिण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.


