रायगड जिल्ह्यात असूनही प्रचंड उकाडा जाणवत असून हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, तसेच सर्व प्रकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आता दुपारच्या सत्राऐवजी सकाळच्या सत्रात भरवण्यात यावेत असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेत. हा आदेश शुक्रवारी १९ जूनपासून ते ३० जून २०२६ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू असणार आहे.
भारतीय हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. आज दुपारी किंवा संध्याकाळी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यातच ‘एल् निनो’च्या प्रभावामुळे यंदा मान्सून अद्याप दाखल न झाल्याने वातावरणात उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. या कडक उन्हाचा आणि दमट वातावरणाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसू शकतो. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून जिल्हाधिकाऱ्याने शाळेबाबत हा निर्णय घेतला आहे. प्रचंड उष्ण वातावरण असल्यानं आणि दिवसभर उकाडा जाणवत असल्यानं गंभीर परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहणे, आवश्यक आहे.
त्यामुळे जिल्हा परिषद अलिबागचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील अधिकारांचा वापर करत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात तात्काळ करण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेत.


