राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला होता. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते, असं विधान त्यांनी केले होते. त्याच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. ‘गोपीनाथमुंडे आज काँग्रेसमध्ये असते तर त्यांचे प्राण वाचले असते.’, असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या खळबळजनक दाव्याने पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे यांना शरद पवारांनी देखील हाच सल्ला दिला होता. ही खूप जुनी बातमी आहे. भाजपमध्ये त्यांचा छळ होत होता. मानसिकदृष्ट्या त्यांच्यावर आघात केले जात होते. ते शरद पवार यांना देखील भेटले होते हे खरं आहे. पण मनमोहन सिंग यांनी त्यांना सल्ला दिला होता की तुम्ही आहात तिथेच थांबा. कदाचित ते जर काँग्रेसमध्ये आले असते तर आज त्यांचे प्राण वाचले असते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना त्यांचा दावा फेटाळून लावला. पंकजा मुंडे यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याला आता काहीच अर्थ नाही. मुंडेसाहेब आज ह्यात नाहीत. त्यामुळे आता त्यांच्याविषयी अशा चर्चा करणे औचित्यपूर्ण नाही. सध्या उपस्थित नसलेल्या व्यक्तीबद्दल मी बोलत नाही. मला जे माझे वडील कळले ते या कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले. हात त्याचा राजकीय प्रवास आहे.’
दरम्यान, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत शनिवारी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत असा खळबळजनक दावा केला होता की, गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. मी मुख्यमंत्री असताना ते काँग्रेसमध्ये येण्यार असल्याचे ठरले होते. त्यांना मंत्रिपद देखील दिले जाणार होते. मंत्रिपद दिले नाही तर नागपूरचे दोघे जण मला निवडणुकीमध्ये पाडतील असे त्यांनी आम्हाला सांगितले होते.’


