मिळनाडू विधानसभा निवडणुनकीत जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र या पक्षाला निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठता आलेला नव्हता. दरम्यान आता तमिळनाडूमध्ये सीपीआय , सीपीआय (एम) आणि व्हीसीके हे पक्ष विजयच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची बाब समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या तिन्ही पक्षांशी चर्चा करून त्यांना टीव्हीकेला बहुमताचा आकडा गाठण्यास मदत करण्यासाठी तयार केले आहे.
विजयच्या पक्षाने निवडणुकीत १०८ जगा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने पाच जागांवर विजय नोंदवला आहे. इतर तीन पक्षांचे प्रत्येकी २ आमदार आहेत.
काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या पुढाकारानंतर लहान पक्षांनी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीपीआय आणि सीपीआय-एम हे दोन्ही पक्ष राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या विरोधात आहेत. दुसरीकडे व्हीसीकेने तामिळनाडूच्या राजकारणात कोणताही बाह्य हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
“आम्ही लोकांनी दिलेला जनादेश बाजूला ठेवून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाहीत,” असे एका सीपीआय (एम) नेत्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. याबरोबरच सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेत एआयडीएमके आणि डीएमके यांच्यात युती होऊ शकते, याची भीती देखील या तीन पक्षांना आहे.
“लोकांनी आधीच डीएमके आणि एआयडीएमके यांना नाकारले आहे. लोकांनी निवडून न दिलेलं सरकार का अस्तित्वात यावं?” असे एक सीपीआय नेते म्हणाले.
व्हीसीकेच्या सूत्रांनी सांगितले की, ते सीपीआय आणि सीपीआय (एम) या पक्षांनी घेतलेल्या निर्णयाबरोबर जातील. “टीव्हीकेबरोबर जावे की नाही याच निर्णय घेण्यासाठी सीपीआय आणि सीपीआय (एम) या दोन्ही पक्षांनी आज सकाळी राज्य स्तरीय बैठका घेतल्या,: असे एका व्हीसीकेच्या सूत्राने सांगितले.
टीव्हीकेच्या आमदारांचीही शुक्रवारी सकाळी बैठक पार पडली. “आम्ही सत्तास्थापन करू यावर आम्हाला ठाम विश्वास आहे. आम्ही ज्या पक्षांशी संपर्क साधला आहे, ते आमच्या पाठीशी उभे राहतील याचा आम्हाला विश्वास आहे,” असे टीव्हीकेमधील एका सूत्राने सांगितले.
विजय जोसेफ यांनी तमिळनाडू येथे सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांच्या पक्षाला सभागृहात आपल्या सरकारचं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. या निवडणुकीत डीएमकेने ५९, एआयएडीएमकेने ४७, पीएमकेने ४, आययुएमएलने २, सीपीआयने २, सीपीआय(एम) ने २ आणि भाजपा, डीएमडीके व एएमएमकेने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.


