मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्यातील गरजू महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी राज्य सरकार चालवत आहे. पण याच योजनेच्या आडून अथवा आधार घेत नराधम महिलांच्या अब्रुला हात घात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगावमध्ये ईकेवायसीच्या नावाखाली महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी संताप व्यक्त केलाय. त्याशिवाय राज्यातील लाडक्या बहिणींना खास मेसेजही दिला. महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे. त्याशिवाय नव्याने लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत राज्यातील लाडक्या बहिणींना खास मेसेज दिलाय. कोणत्याही आमिषाला बळू नये, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे.मात्र, ईकेवायसी करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही. महिला मोबाईलवरून स्वतः ईकेवायसी करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
जळगावमध्ये एका ३५ वर्षीय महिलेला ईकेवायसीच्या नावाखाली शरीर सुखाची मागणी करण्यात आली. ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवून देतो, असे आमिष आरोपी गोकुळ चव्हाण याने दाखवले. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता आणि केवायसी करणे गरजेचे असल्याचे सांगून तो महिलेच्या घरी पोहचला. चव्हाण याने सरकारी कामात मदत करण्याच्या बहाण्याने त्या महिलेकडे थेट शरीरसुखाची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. धक्कादायक म्हणजे, महिलेच्या पतीनं तंबी देऊनही आरोपी पुन्हा त्याच परिसरात येतो. पीडित महिलेचा पाठलाग करत असल्याचाही आरोप आहे. जळगाव पोलिसांनी आरोपी गोकुळ चव्हाण याला बेड्या ठोकल्या असून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.


